मुंबईत २५ नोव्हेंबरला ‘संविधान सन्मान महासभा’; वंचित बहुजन आघाडीची घोषणा

 मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत केलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या स्मृतिप्रित्यर्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यावर्षी २५ नोव्हेंबर रोजी दादरच्या शिवाजी महाराज मैदानावर ‘संविधान सन्मान महासभा’ आयोजित करण्यात आली आहे.

या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरेमहिला आघाडीच्या अध्यक्षा स्नेहल सोहनी, आणि युवा आघाडी अध्यक्ष सागर गवई उपस्थित होते.

अहिरे म्हणाले, “डॉ. आंबेडकरांनी आपल्या भाषणात देशासमोर लोकशाहीचे तीन इशारे दिले — व्यक्तीपूजा टाळा, राजकीय लोकशाहीचे सामाजिक व आर्थिक लोकशाहीत रूपांतर करा आणि जातिभेद कायम ठेवला तर स्वातंत्र्य धोक्यात येईल.”

ते म्हणाले, “आज देशात संविधानविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. अशा स्थितीत ही महासभा संविधानाचे महत्व अधोरेखित करेल. देश बाबासाहेबांच्या संविधानानेच चालेल, मनुवादाने नाही.”

मागील वर्षी झालेल्या सभेला एक लाखांहून अधिक उपस्थिती लाभली होती. यंदा सभा त्याहून भव्य होईल, असा आयोजकांचा विश्वास आहे. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करणार असून देशभरातील मान्यवर उपस्थित राहतील.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp