महाप्रज्ञा बुद्ध विहाराच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त कविसंमेलनात सामाजिक जाणीवेचा जागर


किनवट : तालुक्यातील क्रांती टेकडी, बोधडी (बु.) येथे असलेल्या महाप्रज्ञा बुद्ध विहाराच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त भव्य कविसंमेलनाचे आयोजन उत्साहात पार पडले. या संमेलनात उपस्थित कवींनी सामाजिक परिवर्तन, समता व संविधान मूल्यांवर आधारित एकाहून एक सरस कविता सादर करत रसिकांची मने जिंकली.

     कार्यक्रमाचे आयोजन पूज्य भं. विनयबोधी प्रिय महाथेरो यांच्या पुढाकाराने करण्यात आले. संमेलनाच्या प्रारंभी कवी महेंद्र नरवाडे (सांगावाकार) यांनी
“एक एक भीमसैनिक असा एकत्र यावा,
पाखरांचा जसा थवा बोधीवृक्षावर जमावा”
तसेच
“बाबा तुमची पोरं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा”
या आशयपूर्ण रचना सादर करून कार्यक्रमाला प्रभावी सुरुवात केली.
यानंतर कवी रुपेश मुनेश्वर यांनी
“जिंदगानी बदलली रे भीमाच्या संविधानाने”
आणि
“माझ्या भीमरायाची देणं भारताचे संविधान”
या क्रांतिकारी कवितांद्वारे उपस्थितांच्या जोरदार टाळ्या मिळवल्या.
कवी रमेश मुनेश्वर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करणारी, स्वातंत्र्य व संविधानाच्या मूल्यांवर प्रकाश टाकणारी रचना सादर केली. तर कवी प्रा. गजानन सोनोने (राणीसा) यांनी विद्रोही व विचारप्रवर्तक कवितांद्वारे प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी केले, तर परमेश्वर सुर्वे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाप्रज्ञा बुद्ध विहार बोधडी (बु.) संस्थानचे अध्यक्ष पूज्य भं. विनयबोधी प्रिय महाथेरो यांच्यासह अनिल भवरे, मधुकर गवले, सम्राट झडते, प्रा. प्रदीप एडके, मारोती शिनगारे व रविंद्र सर्जे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp