बिबट्या-अस्वल हालचाली वाढल्या; किनवट वनविभागाच्या सूचना फलकांनी गावागावात जनजागृती


किनवट :
 बिबट्या आणि अस्वलांच्या वाढत्या वावरामुळे किनवट वनविभागाने नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. वनहद्दीलगतच्या गावांमध्ये सूचना फलक लावून तसेच प्रत्यक्ष भेट देत वन्यप्राण्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. उपवनसंरक्षक केशन वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक के. पी. चव्हाण आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद राठोड यांनी नागरिकांनी सूचना पाळून स्वतःसह पाळीव प्राण्यांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.


• वनविभागाच्या महत्त्वाच्या सूचना — सुरक्षितता प्रथम!

 रात्री शौचासाठी बाहेर पडणे टाळावे, झोपताना घरांचे दरवाजे नीट बंद करावेत, जंगलात काम करणारे, शेतकरी व गुरे चारताना किमान दोन-तीन जणांनी एकत्र जावे, लहान मुलांना घरात किंवा पाळणाघरात सुरक्षित ठेवावे, लघुवनउत्पादने गोळा करताना समूहानेच जावे, बिबट्याच्या भक्ष्यातील प्राण्यांची (साळींदर, ससा, डुक्कर, कोल्हा) शिकार टाळावी,बिबट्या किंवा अस्वल दिसल्यास आरडाओरडा करू नये, जंगलात जाताना मोबाईलचा हॉर्न, गाणी किंवा बोलणे सुरू ठेवावे,पहाटे ५ पूर्वी व सायंकाळी ७ नंतर जंगल परिसरात जाणे टाळावे,पाळीव प्राणी रात्री घरातच बांधून ठेवावेत, शेतकऱ्यांनी रात्रीची शेतीकामे टाळावी, पाळीव जनावरे जंगलाजवळ न नेता सुरक्षित ठिकाणी चारावीत, पाणवठे, ओढे, डबकी आदी ठिकाणी बिबट्यांचा वावर असल्याने अशा जागी जाणे टाळावे, प्राण्यांवर हल्ला झाल्यास किंवा हालचाल दिसल्यास वनविभागाशी तातडीने संपर्क साधावा.


•अचानक बिबट्या-­अस्वल समोर आल्यास… घाबरू नका!

 जागेवर स्थिर उभे राहा, दोन्ही हात वर उचलून स्वतःचा आकार मोठा दिसेल असे करा, मोठ्या आवाजात ओरडा—यामुळे प्राणी बहुधा मागे फिरतो, प्राणी दूर असल्यास हळूहळू मागे सरकत सुरक्षित ठिकाणी जा.


• वनविभागाचे आवाहन

वन्यप्राण्यांचा वावर दिसला किंवा हल्ल्याची घटना घडली तर नागरिकांनी कोणतीही जोखीम न घेता त्वरित स्थानिक वनकर्मचारी किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी विभाग व नागरिकांनी परस्पर सहकार्य करणे गरजेचे असल्याचेही वनविभागाने नमूद केले आहे.


Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp