नांदेड : महाराष्ट्र राज्य ग्रामस्वच्छता समितीचे पहिले अध्यक्ष व स्वच्छतादूत माधवराव पाटील शेळगावकर यांच्या जयंतीनिमित्त ज्ञानसंवर्धन मंडळ, शेळगाव गौरी (ता. नायगाव, जि. नांदेड) यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा कर्मयोगी पुरस्कार यावर्षी आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांना जाहीर करण्यात आला आहे.
ग्रामीण व वंचित भागातील विद्यार्थ्यांना गेल्या साडेतीन दशकांहून अधिक काळ यूपीएससी व एमपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करून हजारो प्रशासकीय अधिकारी घडविण्यात दीपक कदम यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात येत असल्याची माहिती ज्ञानसंवर्धन मंडळाचे प्राचार्य संजय पाटील शेळगावकर यांनी दिली.
पुरस्कार वितरण सोहळा १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता, शंकरनगर, धुप्पा येथील संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास खासदार प्रा. रवींद्र चव्हाण, माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराजे पाटील, तसेच प्राचार्य सरोज पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.