उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. भगवंत क्षीरसागर म्हणाले की, आज समता, स्वातंत्र्य व बंधुत्व या लोकशाही मूल्यांवर आघात होत असताना विद्रोही भूमिका घेणे ही साहित्यिक व कलावंतांची नैतिक जबाबदारी आहे. जाती-पाती, वर्गभेद व लिंगभेदाच्या बुरसटलेल्या चौकटी मोडून तथागत गौतम बुद्धांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवणारी विद्रोही साहित्यपरंपरा समाजाला नवी दिशा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बोधचिन्हाविषयी बोलताना चित्रकार श्रीरंग खानजोडे यांनी हे चिन्ह विद्रोही विचारांचा वारसा आणि संघर्षशील वाटचालीचे प्रभावी प्रतीक असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी, राज्य संघटक किशोर ढमाले, संमेलनाचे स्वागताध्यक्ष राहुल प्रधान, मुख्य निमंत्रक डॉ. राजेंद्र गोणारकर, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. अनंत राऊत, मुख्य संयोजक शिवाजीराव गावंडे व डॉ. विजयकुमार माहुरे यांच्यासह यशवंत मकरंद, डॉ. बालाजी पोतुलवार, डॉ. विठ्ठल भंडारे, इंजि. विवेक मवाडे, डॉ. संतोष हंकारे, हेमंत कारले, डॉ. जे. टी. जाधव, दिगंबर घायाळे, पवन जगडमवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रतिमा परदेशी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. भीमराव हटकर यांनी केले. संपर्क कार्यालय सुरू झाल्यामुळे संमेलनाच्या नियोजन व कार्यवाहीला अधिक गती मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.