किनवट, ता. २७ : किनवट नगर परिषद व पंचायत समिती अंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात आलेला ५ टक्के निधी आर्थिक वर्ष २०२५-२६ संपण्यापूर्वी तात्काळ वितरित करावा, अशी मागणी सेक्युलर दिव्यांग मुव्हमेंटच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात संस्थेचे अध्यक्ष ॲड. मिलिंद सर्पे व सचिव दिलीप पाटील यांनी नगर परिषदच्या नगराध्यक्षा तसेच पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना आज(ता.३०)निवेदन दिले आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या एकूण वार्षिक निधीपैकी किमान ५ टक्के निधी दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या निधीतून विविध योजनांची अंमलबजावणी करून दिव्यांग नागरिकांना आर्थिक व सामाजिक आधार देणे अपेक्षित आहे.मात्र, किनवट नगर परिषद व पंचायत समिती कार्यक्षेत्रातील अनेक पात्र दिव्यांग नागरिकांना अद्याप या निधीचा लाभ मिळालेला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ३१ मार्च २०२६ रोजी आर्थिक वर्षाची मुदत संपत असल्यामुळे शासनाच्या नियमांनुसार हा निधी त्या आधी वितरित करणे आवश्यक आहे.
त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून दिव्यांगांसाठी राखीव निधी मंजूर करावा व त्याचे पारदर्शक व नियमानुसार वितरण ३१ मार्चपूर्वी करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग बांधवांना न्याय मिळावा यासाठी प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असेही निवेदनात म्हटले आहे.
Tags
||जिल्हा||
