किनवट : इस्लापूर(ता.किनवट)परिसरात तीव्र उन्हामुळे पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या दुर्मिळ काळवीटाचा नुकताच मृत्यू झाला. या घटनेने वन विभागाच्या पाणी व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
वन विभागाकडून कृत्रिम पाणवठ्यांवर पाणी पुरवण्याचा दावा केला जातो, मात्र प्रत्यक्षात हजारो वन्य प्राण्यांसाठी जसे हरिण, रोही व नीलगाय, पिण्याच्या पाण्याची सोय अपुरी आहे. इस्लापूर येथील हरिण पठारावर मोठ्या संख्येने प्राणी असून, त्यांना पुरेशी पाणी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.
काळवीटाच्या मृत्यूची माहिती प्रादेशिक वन विभागाला नव्हती. शवविच्छेदन करताना पशुवैद्यकीय अधिकारी अनुपलब्ध असल्यामुळे मृतदेह १०–१२ किलोमीटर दूर नेण्यात आला. स्थानिक वन कर्मचाऱ्यांकडून याबाबत कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, तसेच माहिती लपवण्याचा संशय व्यक्त होत आहे.नागरिकांची मागणी आहे की, केवळ कृत्रिम पाणवठ्यांवर अवलंबून न राहता, अधिक ठिकाणी पाण्याची सोय करून वन्य प्राण्यांचे संरक्षण सुनिश्चित करावे.
Tags
||महाराष्ट||
