Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांची चेष्टा थांबवा! – सरकारवर किसान सभेचा हल्लाबोल

किनवट : नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट व परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातात आलेली पिके उद्ध्वस्त झाली असून शेतकरी कर्जबाजारीपण व उपासमार यांच्यात सापडले आहेत. अशा काळात सरकारकडून खरी दिलासा देणारी मदत मिळण्याची अपेक्षा होती, पण जाहीर झालेल्या ५३३ कोटींच्या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांचा अपमान आणि क्रूर चेष्टा दडलेली आहे. जिल्हाभरात झालेल्या ढोबळ अंदाजाने ७ लक्ष २८ हजार हेक्टर शेती पिकांचे नुकसान होऊनही, फक्त ८५ रुपये प्रति गुंठा नुकसान भरपाई देणे हा शेतकऱ्यांवरचा घोर अन्याय आहे, असे ठाम शब्दांत किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. अर्जुन आडे यांनी सांगितले. किसान सभेने सरकारला इशारा दिला आहे की, शेतकऱ्यांचा अपमान करणारी तुटपुंजी मदत मागे घ्या आणि भरीव नुकसान भरपाई जाहीर करा.शेतकऱ्यांसह शेतमजुरांसाठी स्वतंत्र मदत निधी द्यायला हवा, अन्यथा संताप अनावर होईल.त्वरित पिक विमा योजनेतून शेतकऱ्यांचे थकबाकी अनुदान वाटप करा.नदीनाल्यामुळे खरडलेल्या जमिनीची सरकारने जबाबदारी घेऊन पूर्ण दुरुस्ती करावी.राज्य सरकारने तातडीने या मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही, तर शेतकरी रस्त्यावर उतरणार, मोठ्या आंदोलनाची हाक दिली जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारवरच राहील, असा जाहीर इशारा किसान सभेने दिला आहे.

Post a Comment

0 Comments