किनवट : दुर्गम आदिवासी पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव मिळावा आणि बाजारपेठेतील दरघसरणीपासून संरक्षण मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ, पुणे मार्फत राज्यभर हमीभाव खरेदी केंद्रे कार्यान्वित केली जात आहेत. याच उपक्रमांतर्गत सारखणी फार्मर प्रोड्युसर कंपनीत नव्या हमीभाव खरेदी केंद्राचे उद्घाटन नुकतेच आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते संपन्न झाले.
उद्घाटन सोहळ्यात आमदार केराम म्हणाले की, “शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेमुळे दुर्गम भागातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. बाजारात दरकपातीची परिस्थिती असताना शेतकऱ्यांचे संरक्षण होणे अत्यावश्यक आहे. या सुविधेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.”
या केंद्रामार्फत सोयाबीन, मुग व उडीद या पिकांची शासनमान्य हमीभावाने खरेदी करण्यात येणार असून ऑनलाईन नोंदणी व आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक असल्याची माहिती केंद्राचे अध्यक्ष समद फाजलानी यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुसाखान होते. त्यांनी केंद्राच्या कार्यपद्धती, भविष्यातील योजना आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी या प्रकल्पाचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमास भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप केंद्रे, दत्तराव मोहिते (सभापती – माहूर कृषी उत्पन्न बाजार समिती), सिंदखेड पोलीस स्टेशनचे निरीक्षक जाधवर यांच्यासह पवन जयस्वाल, माणिक सेठ, अंकुश जाधव, बाबू ठाकूर, लक्ष्मण मिसेवार, संजय राठोड, नागोराव मडावी, सुफीयान अकबानी आदी मान्यवर उपस्थित होते. परिसरातील शेतकरी व भाजप पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.
